…..” संगीत क्षेत्रातील महागुरू कवी ” मुकुंदजी सोनावणे ” यांचे गायक अजय गायकवाड यांनी केले गुरु पौर्णिमा निमित्त पूजन “……
ख्यातनाम कवी " मुकुंदजी सोनावणे " यांची गीते महाराष्ट्रात गाजणारी !

त्यांच्या गीतातून बहुजन वर्गास ” प्रेरणा ” देणारे विचार……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
काव्य लिहून समाज प्रबोधन व मनोरंजन तर महापुरुषांच्या विचारांची स्फूर्ती देणारे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी ” गुरुवर्य मुकुंदजी सोनावणे ” यांचे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्या मधुर आवाजाने व फेमस गाण्याने सर्वांना आकर्षित करणारे सुप्रसिद्ध गायक ” अजय गायकवाड ” यांनी त्यांच्या घरी जाऊन पूजन करून वंदन केले . भारतीय संस्कृतीतील या महान ” गुरु-शिष्य ” परंपरेचा गौरव जपत, आपल्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवणाऱ्या या आपल्या ” महागुरूस ” पूजन करून आशीर्वाद घेतले.

अनाधी काळापासून या समाजामध्ये गीत गायनातून प्रबोधन करणे सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी शाहीर पोवाडे लिहून , ते गाऊन महिमा, शौर्य, कथा सांगून शरीरात अंगार फुलवत होते , तर संत तुकाराम महाराज यांनी स्वतः ओव्या, भजन लिहून समाजात थोर विचार पेरले . तर संत रोहिदास महाराज, संत कबीर यांनी भारुड, दोहे लिहून समाज प्रबोधन केले. ” जे न देखे रवी, ते देखे कवी ” या उक्तीप्रमाणे आज खऱ्या अर्थाने समाजामध्ये समाज प्रबोधनाचे काम हे कवी , गायक अशी गुरु – शिष्यांची जोडी आपल्या काव्यातून – गायनातून करत असतात.

बुद्ध – छत्रपती – फुले – शाहू – आंबेडकरी विचारांचे त्याचप्रमाणे जुन्या रूढी परंपरा, अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, कुपोषण बालमजुरी, महिलांवर होणारे अन्याय – अत्याचार, जातीभेद यांसारख्या विषयांवर कवी काव्य तयार करतात तर त्यास संगीतमय करून गायक ते गीत श्रोत्यांच्या समोर ठेवून त्यांना तल्लीन होण्यास लावतात, तर त्यांच्या गायनाने शक्ती, भक्ती, आनंद, दुःख, शूरगाथा, वीरगाथा, अशी जनजागृती समाजामध्ये होऊन हि ” क्रान्तिची ज्योत ” पेटवून त्यांचे काव्य भावी पिढीस ” उपयुक्त व प्रेरणादायी ” ठरते. महाराष्ट्राच्या भूमीत दिवंगत लोकगायक प्रल्हाद शिंदे , शाहीर विठ्ठल उमप , तर कर्जत तालुक्यातील वेणगाव येथील शीघ्र कवी व पहाडी आवाजातील गायक पी. ए. उर्फ जीवन घोडके यांसारखे कवी व गायक उदयास आले, कि ज्यांच्या गायनातून महाराष्ट्राच्या जनतेला “अमूल्य ठेवा ” मिळाला.

कर्जत तालुक्यातील भिवपुरी रेल्वे स्टेशन लगत असलेल्या चिंचवली या गावात वास्तव्यास असलेले महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी ” मुकुंदजी सोनावणे ” यांनी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायकांना स्वतः लिहिलेले गीते त्यांच्या मुखातून वदवून बहुजन समाजात विचार पेरून लोक जागृतीचे कार्य सुरू ठेवले आहे . महागुरू मुकुंदजी सोनावणे यांचे अनेक शागीर्द – शिष्य कर्जतमध्ये आहेत, याच कर्जत सारख्या गीत गायनाच्या पंढरीत अव्वल दर्जाचे गायक असलेले ” रंगभूमी संगीत कला मंच ” (नोंदणी क्र. १०९/२०१५-रायगड – महाराष्ट्र) कर्जत तालुका अध्यक्ष व ख्यातनाम गायक, कव्वाली फेम, ऑर्केस्ट्रा व भजन गायक अजय दिलीप गायकवाड, रा. आस्सल, ता. कर्जत , यांनी ” गुरु पौर्णिमेच्या ” दिनी त्यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले .





