……” गुंडगे येथील सामाजिक कार्यकर्ता मंगेश चाहु गायकवाड यांचे निधन “…..
परिसरात हळहळ व शोककळा !

उद्या रविवार ९ ऑगस्ट २०२६ रोजी ” पुण्यानुमोदन व शोकसभा ” कार्यक्रम…..
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
राजकीय – सामाजिक – धार्मिक – सांस्कृतिक क्षेत्रात नेहमीच तळमळीने कार्य करणारे कर्जत नगर परिषद हद्दीतील गुंडगे प्रभागातील ” मंगेश चाहु गायकवाड ” यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी सोमवार ०३ ऑगस्ट २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने परिसरात खूपच ” हळहळ व शोककळा ” पसरली असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .
दिवंगत मंगेश गायकवाड हे नेहमीच गुंडगे प्रभागातील सर्व कामांत अग्रेसर राहून कार्य करत. ” व्यायाम – कराटे – क्रिकेट ” खेळात त्यांना लहानपणापासूनच आवड असल्याने त्यांचे शरीर धष्टपुष्ट होते . क्रिकेट खेळात त्यांनी ” अष्टपैलू ” खेळ खेळून गुंडगे गावाला नेहमीच कर्जत तालुक्यासहित रायगड जिल्ह्यात अनेक पारितोषिक पटकावून ” प्रकाश झोतात ” ठेवले. ऐन तारुण्यात ते अनेक वर्षे उत्तम भाई जाधव यांच्या बरोबरीने ” आझाद बेंजो पार्टीत ” अव्वल दर्जाचा ” कच्ची बाजा ” वाजवत असत. या बेंजो पार्टीचे नाव तालुक्यासहित रायगड जिल्ह्याबरोबरच मुंबई , पुणे महानगरीत हळदी – लग्न समारंभ , गणपती उत्सव , नवरात्र यांमध्ये नावाजलेले होते . यामाध्यमातून संगीत क्षेत्रात बाजा वाजविण्याच्या स्पर्धेत अनेक पारितोषिक पटकावले होते . यांत मंगेश यांचा मोठा वाटा होता.
निर्व्यसनी असलेले मंगेश गायकवाड यांची हेअर स्टाईल संपूर्ण तालुक्यात फेमस होती . इंग्रजी चित्रपटातील ” रॅम्बो ” सारखेच भारदस्त ते दिसायचे. पँथर ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात त्यांनी अनेक आंदोलन , मोर्चे , धरणे यांत हिरीरीने भाग घेतला , तर आर पी आय पक्षाचे गुंडगे प्रभागात उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांचा खारीचा पण महत्वाचा रोल असायचा. आर पी आय चे नगरसेवक तथा प्रथम उपनगराध्यक्ष उत्तम भाई जाधव , नगरसेवक दिपक मोरे, नगरसेविका वैशाली मोरे यांना निवडून आणण्यात ते यशस्वी झाले होते. शिल्पकार युवक मंडळाचे ते ज्येष्ठ सदस्य होते.
ते वेल्डिंगचे जड काम करायचे म्हणून काही दिवसांपासून त्यांना अती रक्तदाब( ब्लड प्रेशर) चा त्रास होत होता. पण त्यांनी याचे कधीच टेन्शन घेतले नाही. सतत हसतमुख व दुसऱ्यांना हसवणारे असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग मोठा होता. हाच ब्लड प्रेशर त्यांचा काळ ठरला. त्यांना याचा त्रास होऊन जोराचा प्रेशर येऊन त्यांना अर्धांगवायू व त्याने ब्रेन स्ट्रोक होऊन ते कोमात गेले. मुंबईच्या के.इ.एम.हॉस्पिटलात त्यांच्यावर उपचार सुरू असताना अखेर सोमवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली.
त्यांचे अंत्यसंस्कार गुंडगे येथील स्मशानभूमीत झाले , यावेळी मोठा जनसमुदाय , बौद्ध बांधव , बहुजन वर्ग उपस्थित होता . त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगी, मुलगा तर भाऊ , बहीण , भाचे , पुतणे , इतरही नातेवाईक असा मोठा परिवार आहे. त्यांचे ” पुण्यानुमोदन व शोकसभेचा ” कार्यक्रम उद्या रविवार दिनांक ०९ ऑगस्ट २०२६ रोजी गुंडगे बौद्ध विहारात सकाळी ११.३० वाजता होणार आहे.त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबात व आर पी आय पक्षात तसेच गुंडगे गावात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे.




