……” असा उड्डाण पूल काय कामाचा ? भिसेगाव ग्रामस्थांचा गुंडगे – आकुर्ले उड्डाण पुलाला विरोध “…..

धन दांडग्यांच्या ” वाहतुकीसाठी ” नाही तर ” आरोग्य – शिक्षण – बाजारहाट – ज्येष्ठ नागरिकांसाठी ” पर्यायी ” भुयारी मार्ग ” हवा……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
भिसेगाव व गुंडगे प्रभागातील त्याच प्रमाणे पंचक्रोशीतील नागरिकांना तातडीने रुग्णांना आरोग्य सेवा मिळावी , महिला वर्गाला बाजारहाट करण्यासाठी , तर विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी कर्जत शहराला जोडणारा पर्यायी भुयारी मार्ग व्हावा , हि जवळजवळ ४० वर्षांची मागणी कर्जत नगर परिषदेने वेळोवेळी ” धुळीस ” मिळवली असताना आता तर ” गुंडगे-आकुर्ले उड्डाण पुल ” याची कुठलीच व कुणाचीही मागणी नसताना ” घाट ” घालण्याचा संतापजनक प्रकार कर्जत नगर परिषद व रेल्वे प्रशासन करताना दिसत असून या उपयोग नसलेल्या उड्डाण पुलाला भिसेगाव ग्रामस्थांचा विरोध असल्याचे चित्र समोर येत आहे .

गुंडगे – आकुर्ले हा 650 मीटर व ₹ 79.14 कोटी इतक्या निधीचा उड्डाण पुल मंजूर व्हावा , म्हणून कर्जत नगर परिषदेने रेल्वे प्रशासनाला पत्र दिले आहे. कर्जत नगर परिषदेमध्ये नुकतीच नागरिकांच्या समस्येवर सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ रोजी बैठक आयोजित केली असता भिसेगाव ग्रामस्थ दिनेश भरकले यांनी भुयारी मार्गाबद्दल प्रश्न उपस्थित केला असता यावर मुख्याधिकारी , नगराध्यक्षा यांनी उड्डाण पूल बद्दल पत्रव्यवहार केल्याचे काहीच सांगितले नसताना अचानक गुंडगे – आकुर्ले उड्डाण पुल मंजुरी बाबतच्या बातम्या सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असताना दिसत आहेत. भिसेगाव व गुंडगे ग्रामस्थांची अशी कुठलीच मागणी नसताना ” धन दांडग्यांच्या वाहतुकीसाठी ” असा पुल व्हावा , यासाठी ग्रामस्थांचा विरोध असून आम्हाला आरोग्य – शिक्षण – बाजारहाट – शासकीय कामांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी तातडीने कर्जत शहरात पोहचण्यासाठी भुयारी मार्ग व्हावा , अशी मागणी असताना कर्जत नगर परिषद ग्रामस्थांच्या भावनेशी खेळत असल्याचे संतापजनक सूर उमटत आहे .

याविरोधात लवकरच सह्यांची मोहीम राबवून कर्जत नगर परिषदेला निवेदन सादर करून या गुंडगे – आकुर्ले उड्डाण पुलाला आमचा विरोध असून ,भिसेगाव-गुंडगेचा वळसा कमी होऊन कर्जत शहर , बाजारपेठ, शिक्षण व आरोग्यसेवा अधिक जवळ येणार ? हे शक्य असते तर मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी याबाबत बैठकीत उड्डाण पुल कसा असेल ? याची माहिती दिली असती , त्यामुळे हा उड्डाण पुल आमच्या काहीही उपयोगाचा नसून या उड्डाण पुलाला आमचा विरोध रहाणार , अशी चर्चा सध्या भिसेगावात जोर धरू लागली आहे.



