……” कर्जतमध्ये प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा “……
" पर्यावरणाची रक्षा " करण्यासाठी केले सामूहिक वृक्षारोपण !

” कै. वसंतराव नाईक साहेब ” यांना अभिप्रेत असलेला ” कृषी विकास ” झाल्यास देश ” सुजलाम सुफलाम ” होईल – डॉ. बी डी वाघमोडे
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
कर्जत मध्ये प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याच्या ” हरितक्रांतीचे जनक ” कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित होणारा ” कृषी दिन ” सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी.डी. वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . यानिमित्ताने पर्यावरणाची रक्षा करण्यासाठी सामूहिक वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ.वाघमोडे म्हणाले की,डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन आणि शिफारशींमुळे कोकणच्या कृषिचा चेहरामोहरा बदलत असून भात उत्पादकतेत लक्षणीय वाढ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न ही वाढले आहे. आंतरराष्ट्रीय तांदूळ व्यापारात भारताचा वाटा जवळपास ” ४० टक्के ” असून एकूण कृषी निर्यातीतून साधारणपणे ” २४ टक्के ” परकीय चलन तांदुळातूनच मिळते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. शेतकरी हेच आपले दैवत आहेत,याची जाणीव ठेवून नवतंत्रज्ञान अवलंबून सामाजिक जबाबदारी पार पाडल्यास कै.नाईक साहेब यांना अभिप्रेत असलेला कृषी विकास होऊन देश सुजलाम सुफलाम होईल.प्रत्येकाने झाडे लावून ती जगविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी सर्वांना केले.
कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी कै. वसंतराव नाईक यांच्या ऐतिहासिक कार्याचा नेटक्या शब्दात आढावा घेतला.मागासवर्गीय व्यक्तीला संधी मिळाल्यास राज्यकारभार चालविण्यात तो कसा आगळावेगळा ठसा उमटवू शकतो,याचे नाईक साहेब मूर्तिमंत उदाहरण होय,असे त्यांनी नमूद केले. ” एक पेड माँ के नाम ” अभियानाची आठवण ठेवून प्रत्येकाने वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन करण्याचा ध्यास घ्यावा, असे त्यांनी आवाहन सर्वांना केले. यावेळी डॉ. महेंद्र गवई, डॉ. नामदेव म्हसकर, डॉ. मीनाक्षी केळुस्कर, डॉ. जीवन कदम, महेशकुमार, ‘ रावे ‘ विद्यार्थी ज्ञानेश्वर पाटील, अथर्व शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
सुरुवातीला कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रवींद्र मर्दाने यांनी केले. कृषी दिनानिमित्त सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी,मजूर तसेच ‘ रावे ‘ विद्यार्थ्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन श्रमदानातून मोठ्या प्रमाणावर सामूहिक वृक्षारोपणाचा कार्यक्रम केंद्राच्या भात पैदास विभाग, उद्यानविद्या विभाग, विश्रामगृहासमोरील परिसर, मॉडेल कृषी विद्या विभागात जवळपास ” ४८० ” वेगवेगळ्या फळे आणि शोभिवंत प्रकारातील वृक्षांची लागवड केली. केंद्राच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. याप्रसंगी उपस्थितांचे आभार डॉ. मर्दाने यांनी मानले.




