…….” भात शेतीसाठी मजुरांची कमतरता आणि मजुरीचे वाढते दर लक्षात घेता ठोस उपायांची गरज “……
शाश्वत भात शेतीसाठी यांत्रिकीकरण आवश्यक - डॉ. पी. यू .शहारे

” डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ – कर्जत संशोधन केंद्राचा ” स्तुत्य उपक्रम……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
” मजुरांची कमतरता ” आणि ” मजुरीचे वाढते दर ” लक्षात घेता शाश्वत भातशेतीसाठी यांत्रिकीकरणाची कास धरणे हाच आजच्या युगात शेती करण्यासाठी ठोस उपाय असल्याचे प्रतिपादन कर्जत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. पी. यू. शहारे यांनी केले. आदिवासी उप योजना, अखिल भारतीय समन्वित बियाणे ( पिके ) योजनेंतर्गत कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या सह्याद्री अतिथी गृह सभागृहात आयोजित भात पीक बीजोत्पादन प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर कर्जत कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ.रवींद्र मर्दाने, तालुका कृषी अधिकारी आर. ए. शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते . यावेळी कर्जत तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते .
डॉ. शहारे यांनी भात ” लावणीपासून – कापणीपर्यंत ” लागणाऱ्या विविध यंत्रांची माहिती देत अल्प खर्चाची , कमी कष्टाची व फायदेशीर शेतीसाठी यांत्रिकीकरणाचे विविध पैलू समजावून सांगितले , ते म्हणाले की, एक एकर भात लावण्यासाठी सव्वा लाख वेळा वाकावे लागते. एक हेक्टर भात शेती क्षेत्रासाठी बैलाच्या सहाय्याने लाकडी नांगर वापरताना ६४ किलोमीटर चालावे लागते तेव्हा भात शेती होते , हे कष्टप्रद असल्याने भात शेतीत यांत्रिकीकरण हि काळाची गरज आहे .
डॉ. वाघमोडे यांनी जमिनीच्या प्रकारानुसार भात जाती कशा निवडाव्यात , पोषणमूल्ये असलेल्या तसेच भाकरी , पोहे , मुरमुरे , जेवणाचा आस्वाद वाढविणाऱ्या वेगवेगळी गुण वैशिष्ट्ये असलेल्या भात जातींचा कसा वापर करावा , हे पटवून दिले. शेतकऱ्यांनी वेळोवेळी संशोधन केंद्राला भेट देऊन नवतंत्रज्ञान जाणून घेतल्यास त्यांच्या उत्पन्नात निश्चित वाढ होईल, यावर प्रकाश टाकला .
तर शिंदे यांनी शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांचा उहापोह करीत ” शेतकरी गट नोंदणी ” करण्याबाबतची पद्धती, त्याचे फायदे सांगून लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी आदिवासी उप योजनेंतर्गत शिलारवाडी, खरबाची वाडी, खोंडेवाडी व नागेवाडीच्या पाच गटाला मनुष्यचलित भात लावणी यंत्र , नॅपसॅक स्प्रे पंप , तसेच ५० शेतकऱ्यांना युरिया ब्रिकेट्स , वैभव विळे , पॉकेट डायरी , घडीपत्रिकांचे वितरण डॉ. शहारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.
तांत्रिक सत्रात क. भात पैदासकार डॉ. महेंद्र गवई यांनी ” भात बीजोत्पादन लागवड तंत्रज्ञान एल ” , वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ.मीनाक्षी केळुस्कर यांनी ” भात बीजोत्पादन नोंदणी ” , मृदा शास्त्रज्ञ डॉ.देवदत्त जोंधळे यांनी भात पिकासाठी खत व्यवस्थापन आणि सेंद्रिय खत निर्मिती तंत्रज्ञान , कीटकशास्त्रज्ञ डॉ.वैशाली सावंत यांनी भात बीजोत्पादन प्रक्षेत्रावरील कीड व रोग व्यवस्थापन , स. उद्यानविद्यावेत्ता डॉ.राजेंद्र सावळे यांनी रोपवाटिका आणि भाजीपाला व्यवस्थापन , यावर मार्गदर्शन केले. यावेळी शास्त्रज्ञांनी विविध शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसनही यावेळी केले .




