गड किल्ल्यांची ” आवड ” व देशव्यापी कार्यात ” सहभाग ” म्हणून ” शिवशंभो युवा हायकर्स ” संस्थेचा यथोचित सन्मान !
" २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी " कर्जत नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम.....

” विकास दादा चित्ते ” यांनी घडविले अनेक साहसी गिर्यारोहक……
भिसेगाव – कर्जत / सुभाष सोनावणे –
गेली ३८ वर्षे महाराष्ट्र राज्यात , रायगड जिल्ह्यासहित , कर्जत तालुक्यात विद्यार्थी दशकातील विद्यार्थ्यांना ” छत्रपतींच्या ” पावन भूमीत गड किल्ल्यांची आवड व ” देशव्यापी ” कार्यात सहभाग घेऊन महान कार्य करणारे कर्जत शहरातील ” शिवशंभो युवा हायकर्स ” हि संस्था अग्रेसर आहे . म्हणूनच त्यांचा येथोचीत सन्मान कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून ” २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी ” मा. नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे यांचे शुभहस्ते करण्यात आले . या प्रसंगी मुख्याधिकारी श्री.तानाजी चव्हाण , उप नगराध्यक्ष संतोष दादा पाटील, गट नेते महेंद्र चंदन , तसेच सर्व नगरसेवक , नगरसेविका व मोठ्या प्रमाणात मान्यवर व कर्जतकर नागरिक उपस्थित होते.
शिवशंभो युवा हायकर्स – कर्जत , हि संस्था कर्जत मध्ये २५ डिसेंबर १९८६ पासून काम करीत आहे. गिर्यारोहण , निसर्ग संवर्धन व सायकलींग या क्षेत्रात गेली ३८ वर्षे कार्यरत आहे . या संस्थेचे माध्यमातून कर्जत मधील साधारण २००० मुलांना गिर्यारोहण प्रशिक्षण दिलेले आहे . मुलांना , युवकांना गड , किल्ले भटकंती यांची आवड निर्माण होणेसाठी संस्थेकडून स्लाईड शो , व गड दर्शन आयोजित करण्यात येते. संस्थेचे माध्यमातून गड किल्ले स्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला जातो .सह्याद्री मधील भटकंती बरोबरच अनेक सुळके सर केले आहेत. हिमालयीन पदभ्रमण मोहिमा, हिमालयीन चढाई मोहीमा यशस्वी केल्या आहेत. अनेक सायकल मोहिमा व हिमाचल मधील लाहोल स्पिती व्हॅली मोटार सायकल मोहीमा यशस्वी केल्या आहेत. कर्जत मध्ये २२ गिर्यारोहण प्रशिक्षण शिबीर, महाराष्ट्र दिनानिमित्त विविध स्पर्धा , किल्ले स्पर्धा , गिर्यारोहण मोहीमा स्लाईड शो , किल्ले प्रतिकृती या माध्यमातून स्फूर्तीदायक काम केलेले आहे . पुर परिस्थितीत पोलिस यंत्रणा , नगर पालिका यंत्रणा व महसुल यंत्रणे बरोबर सहकार्य केले आहे .
या ३८ वर्षातील प्रदिर्घ काम , गिर्यारोहण क्षेत्रातील सातत्य, निसर्ग संवर्धन चळवळ याचा सन्मान मुंबई मध्ये गिरिमित्र संमेलनात या वर्षीचा ” गिरिमित्र गिर्यारोहण संस्था ” म्हणून झाला आहे . ही खूप अभिमान वाटावा अशी गोष्ट कर्जतकरांसाठी आहे . ” ३८ ” वर्षाच्या प्रवासात संस्थेचे माध्यमातून अनेक ” गिर्यारोहक ” तयार झाले आहेत. कर्जत मध्ये गिर्यारोहण क्षेत्रातील पाळेमुळे रुजविण्यासाठी संस्थेने अथक प्रयत्न केले आहेत व अजूनही सुरू आहेत. ” इवलेसे रोप लावियले दारी – तयाचा वेलू गेला गगनावरी ” या उक्तीप्रमाणे हा प्रवास निरंतर सुरू आहे . या देशव्यापी कार्याची नोंद कर्जत नगरपालिका लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी घेऊन २६ जानेवारी २०२६ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे अध्यक्ष श्री. विकास दादा चित्ते व सहकारी सदस्य यांचे शाल , श्रीफळ व सन्मानचिन्ह नगराध्यक्षा सौ. पुष्पाताई दगडे यांचे हस्ते देऊन सन्मान करण्यात आला. मार्गदर्शक मंडळ पदाधिकारी राजाभाऊ कोठारी सर , महेंद्र कर्वे , तुषार दिवेकर, सुधांशू वनगे , जेष्ठ सदस्य दिगंबर कांबळे, प्रशांत दांडेकर , कु. मंजिरी कर्वे यांनी हा सन्मान स्विकारला.




